Skip to main content

रहेगा पिंजरा खाली..

4 सप्टेंबर 20, मुंबई
पिंजरा खाली..
संगीत क्षेत्रात (विशेषकरून मराठी, भक्तिगीते आणि लोकगीते) प्रसिद्ध असलेल्या शिंदेशाहीचे मूळ असलेले ज्येष्ठ लोकगायक श्री प्रल्हाद शिंदे यांनी सत्तरीच्या दशकात अनेक लोकगीते आणि हिंदी कव्वाली गायल्या होत्या. "तूच सुखकर्ता, बाप्पा मोरया रे" हे त्यांनी गायलेले मराठी भक्तिगीत सगळ्यांना ठाऊक असेलच. त्याचकाळात त्यांची एक हिंदी कव्वाली  "उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली" प्रचंड लोकप्रिय झाली होती.

मनुष्याने कितीही धन किंवा प्रसिद्धि कमवली तरी त्याचा शेवट  स्मशानातच होतो, आत्मा रूपी पंछी शेवटी उडून जातो. त्यामुळे मनुष्याने जीवनात साधे सरळ (थोडक्यात कुठल्याही गुर्मीत ना राहता) राहावे असा त्या कव्वालीतील आशय होता. अत्यंत साध्या सोप्या भाषेत. असो.

सबका अंत एक..
कुणी कितीही प्रसिद्ध, श्रीमंत झाला तरी अंत हे अबाधित सत्य आहे. जीवनाचा अमरपट्टा कुणाकडेच नाही किंवा तसा आव ही आणू नये. मग तो खेळाडू असो वा व्यापारी, कलाकार असो किंवा राजकारणी. गम्मत अशी आहे की हा नियम फक्त मनुष्यालाच लागु होतो असे नाही, उद्योग, संस्था, राजकीय पक्ष इत्यादींना सुद्धा लागु होतो. त्यांचा खेळ संपत आला हे हेरून त्यांच्या पिंजर्‍यात असलेले बहुतांश पंछी आधीच उडून जातात.

कुणाच्या पिंजऱ्यात किती पंछी?
एखादे कुटुंब किंवा गट राजकीय पक्ष सुरू करतो - सुरुवातीला आर्थिक पाठबळ जमवत कार्यकर्ता जमवतोमग नेते तयार करतो. मग "have" आणि "have not" मधील दरीचा फायदा घेऊन, कधी जातीचे तर कधी धर्माचे मुलामे चढवून, कार्यकर्त्यांच्या बळावर सत्तासंघर्ष निर्माण केला जातो, जिंकले तर मग सत्ताग्रहण आणि मग तो पक्ष राज्यकर्ता होतो. असा हा प्रवास असतो. एका प्रकारे अनेक पंछी राजकीय पक्षांच्या पिंजर्‍यात येतात, सापडतात, नांदतात.

राजकिय पक्षांच्या पिंजर्‍यात मतदार, कार्यकर्ते, नेते, उद्योजक, कलाकार, मीडिया, आर्थिक पाठबळ देणारे यांचा समावेश असतो. अधून मधून सत्तासुंदरी पण असते. पण ती कायम राहील असे कुणीच गृहीत धरू शकत नाही. पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही.

महाराष्ट्राची जनता सैरभैर...
गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील वातावरण जास्तच गढूळ आहे, तापलेले आहे.
त्याआधी काही ना काही घडामोडी घडत होत्या. गृहमंत्रिपदाचा शपथविधी झाल्याच्या अवघ्या शंभर तासातच गैंगस्टर एजाज लकड़ावाला याला पाटण्यातून अटक करून मुंबईला आणले. दुसरीकडे राजकिय वातावरण या ना त्या कारणाने तापलेले होते - प्रकल्पांना कधी स्थगिती तर कधी रद्दबातल अश्या घटना घडल्या.

मार्च मध्ये आलेल्या कोरोना महामारी मुळे निर्माण झालेले प्रश्न - लॉकडाउन, पोलिसांवरील हल्ले, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावरील बोजा. त्यातच दोन साधूंची नृशंस हत्या, वादग्रस्त वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वर येथे जाण्यास परवानगी, बांद्रा येथे जमाव जमणे इत्यादी.

आता सप्टेंबर सुरू झाला आहे. पूर्वविदर्भात अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे. राज्यात कोरोना थैमान घालतोय, त्यात कुठे रुग्णवाहिकेंचा अभाव, तर कुठे डॉक्टरांची कमी यामुळे होणारे मृत्यू. सगळीकडे उदासीनता आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुरू केलेलं अर्थचक्र एकीकडे हळूहळू गती धरतेय असे वाटत असतानाच प्रशासकीय आणि राज्यकर्ते यांच्यातील समन्वयाचा अभाव त्या गतीला ब्रेक लावतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. विद्यार्थी वर्ग ऑनलाईन शिक्षणाचा वेध घेत असताना दुसरीकडे अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय संस्थेमध्ये कमालीचा संघर्ष सुरू आहे.

अधूनमधून तीन पक्षीय आघाडी मधील सत्तासंघर्षांत राजकिय अस्थिरता डोके वर काढतेच आहे.

हे सगळे होत असताना मराठी मीडियातील बहुतांश घटक राज्यात सगळीकडे "आल वेल " आहे असे वातावरण तयार करण्यात गुंग आहेत, रोज एक नवीन खालची पातळी गाठली जातेय. परवा पुण्यात एका तरुण आणि कामसू पत्रकाराचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना पुण्यातील जंबो सेंटर मधून खाजगी इस्पितळात दाखल करण्यासाठी हवी असलेली ऑक्सिजन एम्बुलेंस वेळेवर मिळाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असे प्राथमिक चौकशीतून पुढे येतेय. त्यामुळे दोन दिवस मराठी मीडिया या प्रकरणी गंभीर दिसली, मात्र आता पुन्हा त्यांना कलाकार, ड्रग्स, राजकारणी इत्यादीचा गॉसिप मध्ये जास्त स्वारस्य दिसतेय.

विदर्भातील पूर परिस्थिती तर त्यांच्यासाठी आफ्रिकेतील पावसासारखी दूरची झाली आहे. मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचे चोवीस तास कवरेज लोक विसरून गेले असावेत असे त्यांना वाटत असावे. त्या कवरेज च्या नावाखाली, एन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कुणाकडून कुठले अजेंडा राबविले गेले हे नंतर स्वच्छपणे दिसले. टीव्ही चॅनेल चे प्रेषक म्हणा किंवा वर्तमानपत्राचे वाचक, हे सगळे पंछी आपल्या पिंजर्‍यात चिरकाल अडकले आहे असा मीडिया संपादकांना /मालकांना भ्रम झालेला दिसतोय.

'चुकीचे वार्तांकन करून किंवा एककल्लीपणे सदैव नकारात्मक  चित्र निर्माण करून आपण काहीही करू शकतो' असा विचार बाळगणे मोठी गफलत आहे हे मराठी माध्यमांना अजून कळलेले दिसत नाही. त्यांना जर TRP मध्ये एवढा रस असेल तर त्यांनी, एनडीटीव्ही ची TRP रेटिंग बघावी - रिपब्लिक इंडिया ची TRP 19-20 आहे तर एनडीटीवी इंडिया ची 1.8 - उरलेले 2 ते 18 मध्ये गुंडाळले.

गेल्या दोन दिवसांत मराठी कलाकारांची मराठी अस्मिता अचानक जागृत झाली. मराठी कार्यक्रमात हिंदी गाणी लावून नाचणारी ही मंडळी अचानकपणे मराठी अस्मिता, मुंबई प्रेम दर्शवू लागली. त्यांचे बेगडी प्रेम बघून दर्शक नावाचा पंछी कधी उडून जाईल हे त्यांना कळणार ही नाही.

पिंजरा कधीही खाली होऊ शकतो..
सत्ता, मग ती केंद्रात असो वा राज्यात किंवा महानगरपालिकेत - ही काही चिरकाल राहत नाही, राहणे शक्य नाही, तसे होऊ सुद्धा नये. तेव्हा आमची पंचवीस वर्षे राज केले किंवा आता आमचीच सत्ता आहे याचा जर कुणाला दंभ झाला असेल तर तो त्यांच्याचसाठी चुकीचा ठरू शकतो. येणारा काळच दाखवेल की त्यांची दांभिकता किती खरी. मात्र सत्तासुंदरी नावाचा पंछी पिंजर्‍यातून कधी फुर्र होईल हे त्यांना काही कळणार ही नाही.

यानंतर जे पंछी उरतात ते म्हणजे मुद्दे, नेते, कार्यकर्ते आणि आर्थिक पाठबळ देणारे.

काही राजकीयपक्षांचा मूळ मुद्दा (जर तो कधी होताच तर) कधीच उडून गेला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी भाजप आणि शिवसेना यांचे सरकार राज्यात पुन्हा स्थापन करण्यासाठी अविरत प्रयत्न केले, त्याला अभूतपूर्व यश सुद्धा लाभले. परंतु, शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस सोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली. त्याच दिवशी हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यापासून मैलोन्मैल लांब चालला गेला असावा. हिन्दुत्व नावाचा पंछी उडून गेला.

मुंबईची दरवर्षी तुंबई होणे किंवा रस्ते खड्डेयुक्त होणे हे काही कौतुकास्पद नाही किंवा याचा मुंबईच्या स्पिरीट सोबत काडीमात्र संबंध लावू नये. राज्यात सुद्धा रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. हे बघणारा माणूस मराठी माणूसच आहे. महाराष्ट्राचाच आहे. त्याची अस्मिता रोज खड्ड्यात जातेय.

कोरोनामुळे अनेकांनी परिवारातील सदस्य, नातेवाईक, शेजारी, मित्र गमावले आहेत. दुर्दैवाने यातील अनेक मृत्यू एम्बुलेंस, बेड, डॉक्टर, किंवा औषधि वेळेवर ना मिळाल्यामुळे झालेले त्यांनी बघितले आहे, अनुभवले आहे. हे सुद्धा मराठी आहेत. महाराष्ट्राचेच आहेत.

तेव्हा मुंबई, मुंबईची संस्कृति, मराठी माणूस, मराठी अस्मिता यावर आपला कॉपीराईट सांगणार्‍या मंडळीनी काही नवीन विचार करायची वेळ आली आहे. नाहीतर हे पंछी तुमच्या सोनेरी पिंजर्‍यातून फुर्रर्र झालेच म्हणुन समजा.

घरचे पंछी..
नव्या घरोब्या मुळे जमिनी वरील कार्यकर्ते, गट प्रमुख यांची आधीच पंचाईत झाली असावी, त्यामुळे ते कधी उडून जातील काही शाश्वती नाही. त्यात ज्यांना तिकिटे मिळाली नाही, ज्यांना तिकिटे मिळाली पण हरले, जे जिंकले पण ज्यांना पदे मिळाली नाही, ज्यांना पदे मिळाली पण किम्मत मिळत नाही - असे अनेक पंछी सध्या पक्षाच्या पिंजर्‍यात असतिल. यातील किती पंछी कधी उडतील हा येणारा काळ दाखवेलच, बहुतांश उडून जाण्याची शक्यता मात्र जास्त दिसते.

शेवटी उरतात ते नेते आणि आर्थिक पाठबळ पुरविणारे. यांचे अस्तित्व सत्ता असेल तर दिसते, नाही तर बोजाच अधिक. पक्ष स्थापन करणार्‍या मंडळीकडे त्यांचा पिंजरा कधी भरेल याकडे टक लावून बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

जाता जाता..
सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेले प्रश्न आणि त्यांची हाताळणी राज्यातील जनतेने बघितली आहे, अनुभवली आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये ताणतणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. सामान्य जनतेला हा विषय तेवढा जिव्हाळ्याचा नसावा, मराठी मीडिया त्या किती एकदिलाने झाल्या हे रंगवण्यात मशगूल आहे.

परंतु सामान्य जनतेला चक्रीवादळ, पूर परिस्थिती, कोरोना महामारी हे नीटपणे हाताळण्यात आले नाही, किंवा साधूंची नृशंस हत्या, किंवा दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाची चौकशी किंवा अमली पदार्थांच्या तस्करीचा शोध अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता होती असे वाटणे साहजिक आहे. यामुळे सरकारवरील नाराजी वाढू शकते. त्याचा फटका आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेनेला सर्वात जास्त बसण्याची शक्यता आहे.

"उडाले ते कावळे, उरले ते.. " यात यमक जुळून येतो, मात्र तसे झाल्यास त्या पक्षाची वस्तुस्थिती सुधारत नाही. शेवटी ज्यांचा पंखात बळ असते तेच उडतात हेही लक्षात घ्यायला हवेपिंजरा सोन्याचा असो वा लाकडाचा, पंछी तेव्हाच येईल जेव्हा त्याला यायचे असेल. मुळातपिंजरा” मनोवृति ही चुकीचीच, त्यातल्या त्यात आजच्या मिलेनियल किंवा जनरेशन नेक्स्ट ला पिंजरा तोडून उडायची सवयच आहे.

कव्वाली या संगीत प्रकारात बहुतांश वेळी जीवनातील अबाधित सत्यावर भाष्य केले जाते, संदेश दिला जातो. गरज असते प्रेक्षकांनी तो आत्मसात करण्याची. नहीं तो फिर, "चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा".

येणार्‍या काळात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आधार घेऊन काही घडामोडी घडतात किंवा घडवल्या जातात का हे बघणे औत्सुकतेचे ठरेल. (वाचा जनता सोसतेया कळ, मध्यावधि अटळ).

तूर्तास इथेच विश्रांति.

धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com 
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
***************


Comments