Skip to main content

भरलेले ताट आणि कुरकुरणारी खाट


20 जून 20
भरलेले ताट आणि कुरकुरणारी खाट.. 

परवा एका मित्राच्या मुलाशी बोलणे झाले. नोकरीच्या कारणाने हा मुलगा आपल्या आईवडिलांपासून लांब राहत होता. लग्न व्हायचे होते त्यामुळे, समवयस्क मित्रांसोबत रहायचा. बोलता बोलता म्हणाला की सध्या जिथे राहतो तिथले फर्निचर जुनाट आहे, टेबल डगमगतो, खुर्च्या आवाज करतात. माझ्या माहितीप्रमाणे आधी तो एका मित्रासोबत त्याच्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहत होता, तेव्हा तिथले फर्निचर एकदम नवीन आणि व्यवस्थित होते. जेव्हा मी हे त्याला मी सांगितले तर म्हणाला, की आता तो दुसर्‍या मित्रांसोबत राहतो, आधीच्या मित्रा सोबत भांडण झाले (की केले?) तेव्हापासुन तो एका जुन्या पण फारसे सौख्य नव्हते म्हणुन दूर राहणार्‍या मित्रा च्या फ्लॅट मध्ये भाड्याने राहतोय.

फ्लॅट नवीन दिसत असला तरी आतून फार काही व्यवस्थित नाही, त्याच्या या "जुन्या पण नवीन" मित्राने भावड्याचे फर्निचर आणून टाकले, ते सुद्धा जुने पुराणे. खायचे वांधे आहेत. स्टोव आहे तर केरोसिन नाही, भाजी आहे तर पीठ नाही अशी अवस्था. मात्र, डिपॉझिट आणि बारा महिन्याचे भाडे हे अगाऊ (अ‍ॅडवान्स) द्यावे लागले, सगळी बिलं वेळेवर भरावी लागतात ते वेगळेच!

धीच्या फ्लॅट मध्ये कधी भाडे भरल्याचे आठवत नाही, फ्लॅट एकदम स्वच्छ आणि सुटसुटीत होता, फर्निचर, वस्तु सगळे व्यवस्थित होते, इतकेच काय तर खायची व्यवस्था पण एकदम भारी होती. सगळे कसे सुटसुटीत होते, कारण आधीचा मित्र हा शिस्तप्रिय आणि कामसू होता, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायच्या. मित्र सोबत रहायचा, त्याला काही वाईट सवयी नव्हत्या. इतर ठिकाणी सुद्धा त्याचे फ्लॅट्स असल्यामुळे याला वर्षातून अनेकदा मौजमजा करण्यासाठी तिथे जायला मिळायचे, फूकट!!

"तुला त्या जुन्या आणि चांगल्या मित्राची आठवण येते का ?" असे विचारल्या वर, मुलगा म्हणाला, "ह्या जुन्या पण नवीन मित्राने एकदा मला पार्टी दिली, आणि घरी आल्यावर मी ह्या जुन्या पण चांगल्या मित्राशी काहीही कारण नसतांना भांड-भांड भांडलो".नंतर मी या जुन्या पण नवीन मित्राकडे गेलो, तो म्हणाला माझ्याकडे रहा, स्वर्गलोक सारखे सुख मिळेल. पण कसला स्वर्ग आणि कसले सुख. आता सोडायचे म्हंटले तरी हा जुना पण नवीन मित्र मला काही जाऊ द्यायचा नाही. शिवाय माझे डिपॉझिट आणि सहा महिन्याचे भाडे सुद्धा त्याच्याकडे आहे. त्या जुनाट कडमडणार्‍या फर्निचरचे भाडे सुद्धा अगाऊ भरले आहे.

या घरात, मित्राचे, "नको त्या प्रकारचे" मित्र येतात, त्यांची सगळी व्यवस्था मलाच करावी लागते, त्यांना जोरदार खान-पान लागते, गाड्या लागतात, ह्यामुळे उधारी पण भरपूर झालीय. माझे नाव सुद्धा खराब होतेय. तेव्हा आता जर मी याला सोडले तर माझे मोठे आर्थिक नुकसान होणार. तेव्हा वर्ष संपल्यावर बघु. "पण मग तेव्हा हा तुझा जुना नवीन मित्र तुझे डिपॉझिटचे पैसे परत करेलच ह्याची काय खात्री?". हे ऐकून तर तो कोलमडलाच, म्हणाला, मला पण अशीच शंका आहे, खरे सांगू (बाबांना सांगू नका), मला परत त्या जुन्या आणि चांगल्या मित्राकडे जायचे आहे, पण आता कुठल्या तोंडाने जाऊ?

मग मीही म्हणालो , "खरे तर तु तुझ्या जुन्या आणि चांगल्या मित्राला सोडायलाच नको होते, नाही तो उद्दामपणा केलास, त्या मित्रासोबतच त्याच्या घरच्यांचा आणि ज्येष्ठांचा अपमान केलास, त्यांना नाराज़ केलस. चूक तुझीच आहे, स्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वर्गलोक सुखासाठी, तू या नको त्या मित्राच्या नादि लागला. अरे, तुझ्या डोळ्यादेखत, या तुझ्या नवीन मित्राच्या परिवारातीलच एक सदस्य तुझ्या त्या जुन्या आणि चांगल्या मित्राकडे गेला होता, तेव्हाच तुला कळायला हवे होते, चांगलं काय आणि वाईट काय. बघुया, पुढे काही चांगले होईल, तूर्तास कळ सोसावी लागेल, काळजी घे", असे सांगून संभाषण संपविले.

मी फारसा आशावादी नव्हतो, पण त्याला धीर देणे गरजेचे होते. बघुया पुढे काय होतेय ते. असो.
*******
हा वार्तालाप झाल्याचा दोन दिवसांनी काही निदर्शनास आले. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या एका पक्षाच्या मुखपत्राच्या सम्पादकीय अग्रलेखातून "जुनाट आणि कुरकुरणार्‍या खाटे" ची जाहिरात झाल्याचे टीव्ही आणि सोशल मीडिया मधुन कळले. माध्यमांमधील त्याबद्दलची चर्चा बघितली.

विदर्भाचा असल्यामुळे, आमच्याकडे "खाट" हा शब्दप्रयोग तसा कमीच चालतो, बहुतांश मंडळी तिला "बाज" म्हणतात. जाऊद्या, "खाट" म्हणा की "बाज" म्हणा," माज" तर तोच राहणार ना? असो.

खाट कधी कुरकुरते
जेव्हा तिचे चारही पाय ढिले पडतात, किंवा तिचे दोर (रस्सी) ढिले पडतात किंवा त्यात गाठी पडतात. कधी कधी वजन जास्त पडले की सुद्धा खाट कुरकुरते! किंवा कधी कधी, कुरकुरणारा आवाजच खोटा असतो, कुणी दुसराच काढत असतो.

तेव्हा खाटेवर बसलेल्यांनी याची खातरजमा करणे गरजेचे आहे. कारण खाट जरी जुनी पुराणी वाटत असली, तरी तिचे मूळ पाय दिल्लीतील उच्चदर्जाच्या शिशम (शिसवी) लाकडाचे आहे, अनेक दशके हे लाकूड पक्के राहते असे म्हणतात. नाही राहिले तरी, खाटे च्या पायांमध्ये चांगल्या दर्जाचे "bracket" लावले तर ती व्यवस्थित होईल (आता हे ब्रैकेट कशाचे राहिल हे ज्याचे त्याचे ठरवावे .काही आठवड्यांपूर्वी राज्यातील कांग्रेस महत्वाचे नेते त्यांच्या हायकमांडला भेटल्याच्या बातम्या होत्या) . पण ते करणार कोण? बसणारा करणार की, तिचा मालक करणार, की ज्याने भाड्याने दिली आहे तो करणार?

वृत्तपत्रातील "खाट कुरकुरतेय" या  शब्दप्रयोगाला आपण जर गांभीर्याने घेतले तर असे आढळेल की, "ये तो होना ही था".

पक्षाची जडणघडण, विचारधारा, राजकारण करण्याची पद्धत, भूतकाळातील कर्म इत्यादी अनेक बाबी आहेत ज्या एकमेकांशी जुळत नाहीत. शिवाय महत्वाचे म्हणजे, आघाडीमध्ये जे समीकरण (विशेषत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री वेगवेगळे) असावे लागतात, ते जुळताना दिसत नाही. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांच्यातले समीकरण. सध्या हे दोन्हीही पद एकाच व्यक्तीकडे असल्याने, दुसर्‍या पक्षांचे मधल्या फळीतील नेते सुद्धा "प्रमुख - प्रमुख" , "प्रमुख - मुख्यमंत्री" असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात धुंद आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तिला दोन वेळा खेळावे लागते. त्यात शक्ति, युक्ती, आणि बुद्धि सगळे जाते.

नेमका आवाज कुणाचा?
आधी म्हटल्या प्रमाणे, खाट कुरकुरत आहे असा "बाज" कुणीपण आणू शकतो! ज्याला बाहेर पडायचे असेल तोच असा गनिमीकावा करेल किंवा कात्रजचा घाट दाखवेल, किंवा आभाळातून (म्हणजे दिल्लीतून) वीज पाडेल. गनिमी कावा किंवा कात्रजचा घाट दाखवायचा असेल, तर कदाचित एखाद्या वेळेस ही "मोसम" तपासण्यासाठी घटक चाचणी पण असू शकते. किंवा मग, येणार्‍या काळात घडणार्‍या घटनांमध्ये (विधान परिषद निवडणुका) मोठा वाटा किंवा जबाबदारी (आत्मनिर्भर कार्यक्रम) मिळण्यासाठी ही कुरकुर असावी.

गेल्या नोव्हेंबर नंतर राज्यात अनेक घटना घडल्या आहेत - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूदर, त्याचा राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर पडलेला ताण, श्रमिक कामगारांचे स्थलांतर, त्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणातला घातलेला थैमान, नुकसान इत्यादी. मध्यंतरी च्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकी बिनविरोध झाल्या, त्यात भाजपला अपेक्षेपेक्षा एक जागा जास्त मिळाली. निवडणुका झाल्या असत्या तरीही कदाचित ती जागा भाजपलाच मिळाली असती परंतु त्याने झाकलेली मूठ बाहेर आली असती - महाआघाडीतील बेबनाव पुढे आला असता.

या सगळ्या प्रकारात मात्र महाराष्ट्रातील अनेक प्रगतीशील प्रकल्पांना स्थगिती दिली गेली किंवा बंद केले गेले जसे मुंबई मेट्रो 3चे काम स्थगित करणे, अनेक ग्रामीण भागांत जलक्रांती घडविणारी योजना, जलयुक्त शिवार रद्दबातल करणे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ काही केल्या कमी होत नाहिये.शेतकरी कर्जमाफी योजना रखडली गेली आहे. गेल्या तीन चार महिन्यात, केवळ महाराष्ट्रातच बाराशेच्या वर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आहेत. हे दुर्दैवी आहे

काही राज्यांमध्ये, पुर्ननिर्माण करिता नवीन योजना आणल्या जात आहेत. त्यामानाने महाराष्ट्रात निर्णायकी (निर्नायकी नाही) कारभार दिसत नाहियेइतर राज्यांच्या तुलनेत आपला महाराष्ट्र मागे पडतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

विभंगरेषा (fault-lines) तयार
मंत्रिमंडळ / खातेवाटपालाच एक दीड महिना लागला. याखेरीजएल्गार प्रकरण, वाधवान कुटुंबाची महाबळेश्वर सहल, पालघर येथील नृशंस हत्याकांड, पत्रकारांवर दंडुकेशाही, सारथीचा कडेलोटप्रशासकीय अधिकारांच्या बदल्या, मंत्रिमंडळातील समन्वयाचा अभाव, प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमधील संघर्ष, ज्यामुळे, कुरबुरी किंवा कुरकुरणे पुढे येत आहेत.
  • पक्षांतर्गत धुसफुस, नाराजी
  • महामहिम राज्यपालांसोबत संघर्ष होईल अश्या अनेक बाबी घडत आहेत. राज्यपालांनी दर वेळेस आपल्या अनुभवाने आणि परिपक्वतेने हे संघर्ष टाळले.
  • मध्यंतरीच्या काळात, शेतकरी कर्जमाफी योजनेत सांगली जिल्ह्यात काही गैरप्रकार होतोय याच्या बातम्या आल्या होत्या. केंद्राकडून आलेल्या धान्याचा यथोचित वाटप झाला नाही अश्या अनेकांच्या तक्रारी होत्या.
  • निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागांसाठी मोठे असे अनुदान अजुन सुद्धा जाहीर झाले नाही. कोकणाला पुनर्निर्माणाची गरज आहे. (वाचा, "तू चाल पुढं, तुला गड्या भीती कशाची" , https://windcheck.blogspot.com/2020/06/blog-post_16.html )
  • कालच मणिपूर, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये राज्य सभेच्या निवडणुका झाल्यात, त्यात राजस्थान सोडले तर, इतर राज्यात कॉन्ग्रेसला अपेक्षित असलेली मते फुटली. ही एक लक्षणीय बाब आहे (विशेषत जेव्हा कुणी गोव्यात जाऊन सरकार बनवायच्या बाता करतात). महत्वाचे म्हणजे हेवीवेट समजले जाणारे आणि दिल्लीमध्ये ज्यांचा शब्द चालतो, त्या अहमद पटेल यांच्या देखरेखिखाली या निवडणुका झाल्या. गुजरातमधील दुसऱ्या जागेचा पराभव हा त्यांचा पराभव समजला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय पटलवार अहमद पटेलांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
  • राजस्थान मध्ये सत्ता बदलाचे वारे वाहतील अशी स्थिती आहे.
  • येत्या काळात केंद्रीय स्तरावर काही मोठ्या घटना होऊ शकतात, काही प्रस्ताव / कायदे आणले जातील.
  • आजघडीला महाविकास आघाडीमध्ये पाच माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अनुभवाचा किंवा कार्यक्षमतेचा दिसेल असा परिणाम जाणवत नाही. जाणवतो तो एक अदृश्य संघर्ष.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मध्यंतरी ED च्या रडार वर होते. राष्ट्रवादीतील काही नेते हिंदुत्व, वीर सावरकरांचा आदर या भूमिकेत आहे, तर काही अत्यंत मुस्लिम धार्जिणे आहेत. या दोन्ही भूमिका कॉन्ग्रेस आणि शिवसेनेला त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्या शिवारात येण्यासारखे आहे.
  • 2024 च्या लोकसभा निवडणुकी महा आघाडीतच लढण्याच्या घोषणा केल्या गेल्या, आणाभाका घेतल्या गेल्यापुढच्या वर्षीपासून मुम्बई महानगरपालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहायला सुरू होतील. तेव्हा या आणाभाका किती पोकळ आहे की शाश्वत आहे हे कळेल (अर्थात तोपर्यंत हे सरकार टिकले तर).
तेव्हा जर नीट लक्ष देऊन बघितले तर, गेल्या सहा-सात महिन्यात  महाराष्ट्राच्या, विशेषतः महाविकास आघाडीच्या राजकिय पटलावर अनेक विभंगरेषा (fault-lines) तयार झाल्या आहेत. येणार्‍या काळात अनेक अश्या बाबी घडतील ज्यामुळे या विभंगरेषा (fault-lines) मोठ्याच होतील, आणखी गहिर्‍या होतील. चाणाक्ष नेते विभंगरेषेतून प्रवाह (undercurrent) तयार करतात. बुद्धिवान नेते त्याला दुसरे प्रवाह जोडतात, पाणी आणतात (ते महाराष्ट्राचेच असेल असे नाही), त्या जोडप्रवाहाला अजून गती देतात. एकदा गती आली की त्याचे रूपांतर पुरात कसे करायचे हे स्थानिक नेते, प्रसार माध्यमे जाणतातच .

"
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे", असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या महिन्यात केले होतेदेवेन्द्र फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणाचे एक जाणते नेते आहेत, त्यांच्या अभ्यास आहे, आणि निरिक्षणशक्ति अफलातून आहे. आपल्या राजकिय चाणाक्षपणे त्यांनी 2018 - 19 मध्ये राज्यातील अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या. नवीन समीकरणे तयार केलेत. तेव्हा त्यांच्या वरील वक्तव्याला महत्व प्राप्त होते.

येणारा काळच दाखवेल महाराष्ट्राच्या राजकीय पटांगणात काय घडते ते - कुस्ती होते, की खो खो खेळले जाते. आज घडीला मात्र "खाट कुरकुरत आहे" हे नवीन नाट्य सुरू आहे. कोण "बाज (स्टाइल)" दाखवून "बाजी" मारून नेतो हे बघणे महत्वाचे. कुणीतरी भरलेले ताट घेऊन खाटेवर बसलेय. कुरकुरणारी खाट पाय तुटून खाली बसते, की दोर्‍या निखळून खाली बसते की अजून काही, हे औत्सुकतेचे ठरेल. नदीला मोठा पूर आला की दूर जावे लागते. "आमचे बरे चालले आहे" याचा भास कितीही निर्माण केला तरीही पूर आला की दूसरी जागा शोधावी लागेल. ती जागा जुनी आहे की नवीन हे काळ दाखवेलच.

"कुरकुरणार्‍या खाटेच्या" अमाप यशानंतर, संपादक महोदय आपल्या मित्रांना "काटे" म्हणतील का, हे बघावे लागेल. तसे झाले तर कदाचित त्यांच्यावर कवि अनिल यांच्या वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या या ओळी म्हणण्याची वेळ येईल?? 

"
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

मिसळुनि मेळ्यात कधी
एक हात धरुनी कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो"


कालाय तस्मै नमः.

धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

Battle of Generations, Mumbai

 4th January 2026 Battle of Generations - Mumbai’s time is “NOW”.. Mumbaikars’ tryst with democracy is on 15th January when voting for the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), asia’s richest governance setup takes place. This is a golden chance for voters across all generations like boomers, Gen X, Millennials and Gen Z to elect a set of corporators who could solve their basic problems, and address aspirations optimally. Although each generation’s priorities would be different – from modern infra to lesser corruption to transparency to communal harmony to environment to preserving linguistic identity or track record or diversity-equity-inclusivity to futurist (looking ahead).  This heady mix of generations and their priorities makes it a lot difficult for political parties to make a common denominator of promises, and put them on their voting platter. Hopefully, the intelligent ones will be able to make a good & believable platter of promises. Less of freebies and m...

Moment of reckoning, Mumbaikar

 Mumbai. For some it is a city of dreams and glamour, some had "haadsaas (accidents)", many made a "good life" out of it, few made generational wealth while enduring here. So what is this Mumbai exactly? Is it a home to slums or glossy sky-scrapers, curvy-flyovers or is it a thriving economy, or a culture or a simple habitat? Maybe all of that. Most importantly, it is like a sea of wealth!! With every incoming wave it brings wealth to many, and with every outgoing tide it erodes wealth of a few! This “sea of wealth” has been a relentless attraction for majority of its inhabitants. For ages and Generations. All socio-economic classes thrive on that sea of wealth : the ultra-mega-super rich to neo-rich to upper middle-class to middle class to lower middle-class to financially constrained. This sea of wealth gives rise to aspirations to each of these classes – every moment. All of these classes have a symbiotic relationships with each other, and that's how this ci...

Rise with the Sunrise: CBG

15 February 2026, Mumbai   Rise with the Sunrise: Compressed Bio-Gas and India’s Emerging Green Economy In every developing economy, certain industries initially appear futuristic and ahead of their time. Some of them fade away, but a few evolve into what we call  “sunrise sectors. ” After a period of incubation, these sectors become significant contributors to economic growth. India has witnessed this journey with Information Technology, Telecom and Modern Retail. Today's sunrise sectors are tomorrow's  dominant industries or mainstream economy staples. Today, sectors such as  Semiconductors, Solar Power Generation, Battery Energy Storage Systems (BESS), Millet-based Food Products, Green Data Centres, Green Warehouses, Technical Textiles and Compressed Bio-Gas (CBG)  are fast emerging as the new sunrise sectors of India.  While the underlying technologies have existed for decades, mainstream adoption is now accelerating. In the coming years, t...