Skip to main content

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई

राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते.

तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील एक मत अवैध करण्यात आले. शेवटी भाजपने सहापैकी तीन जागा जिंकल्या, आघाडी मध्ये सगळे काही सुरळीत नाही याची ती पावती होती. भाजपकडून उशिरापर्यंत जल्लोष झाला.

ह्या साखळीतील दुसरे अंक 20 जूनला घडले जेव्हा विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान झाले. भाजपाच्या संख्याबळानुसार चार जागा अपेक्षित होत्या. परंतु, राजकिय किमया अशी घडली की कॉन्ग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार पराभूत झाले आणि भाजपाचे पाचवे उमेदवार निवडून आले. हा विजय अजून मोठा होता कारण संख्या ही दर्शवत होती की भाजपकडे 134 आमदारांचा पाठींबा आहे (145 आवश्यक असतो). त्यादिवशी कुणी या आकड्यांच्या खोलात शिरले असेल तर त्याला असे नक्की आढळले असेल की दरी आहे, अधिक मोठी होऊ शकते. 10 जूनला जे झाले होते त्याच्या पुढचे पाऊल 20 जूनला पडले होते, किंबहुना पाडून दाखवले होते कुणीतरी. दरी आहे, आणि ती चांगलीच मोठी असल्याची पावती, आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चाणाक्ष राजकारण्याने नक्कीच हेरला होता. विधानपरिषद निवडणुकीचा निर्णय घोषित झाला तेव्हा जल्लोष झाला, मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्या मोबाईल वर सारखे टाइप करताना दिसत होते. त्यारात्री जल्लोष फार काळ झाला नाही!

2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळी त्यांच्याकडे 170 अधिक आमदारांची शक्ति होती. अडीच वर्षांत असे काय घडले की ही शक्ति काठावर आली. याचे उत्तर दुसर्‍या दिवशीची पहाट घेऊन आली. 21 जूनला सकाळी बातम्या धडकल्या, श्री एकनाथ शिंदे यांच्यासह दहा-बारा आमदार गुजरात येथे गेले आणि पक्षासोबतचा त्यांचा संपर्क तुटला! त्यानंतर पुढील दहा दिवस जे घडले ते राज्याने नव्हे तर देशाने बघितले. 30 जूनला श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर श्री देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, एकप्रकारे शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुनर्स्थापित झाले.

गेल्या अडीच-तीन वर्षांत राज्याच्या राजकारणात एक अस्थैर्य निर्माण झाले होते. त्याला कुठेतरी आळा बसला असे वाटायला वाव निर्माण आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते 20 जून 2022 या कालखंडात राज्याचे राजकारण निवडक एक-दोन व्यक्तींच्या अवतीभवती कसे केंद्रित करता येईल यासाठी मराठी माध्यमांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

आघाडी सरकार स्थापन झाले त्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कोरोना महामारी आली. लाखो मेले. निसर्ग, तौक़्क्ते सारखी मोठी चक्रीवादळ हैदोस घालून गेली. विदर्भ, मराठवाड्यात महापूर येऊन गेले, परंतु माध्यमांनी पुरेपूर काळजी घेऊन, राज्यात आल-वेल आहे असे चित्र निर्माण करण्यात काहीही कसर ठेवली नाही.

मात्र या अडीच वर्षांत एक व्यक्ति राजकारणाच्या पलीकडे जाऊन पायाला भिंगरी लागल्यागत फिरत होती, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. मीडिया सोबत असो वा नसो, कोरोना काळात त्यांनी राज्य पिंजून काढले, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांना सगळ्यांना गावागावात जाऊन भेटून परिस्थिती जाणुन घेतली, औषधि, उपकरणे आणि बेड साठी जमेल तश्या व्यवस्था लगोलग लावल्या. हे करताना लोकप्रतिनिधी आपल्या पक्षातील आहे की नाही याचा कधी विचार झाला असेल असे कुणीच म्हणणार नाही, सगळ्यांसाठी प्रयत्न झाले. म्हणुनच त्यांच्या बाबतीत इतर पक्षातील अनेक लोकांमध्ये सुद्धा विश्‍वास आढळतो.

संघटन, संस्था, संत,  समाज, सहकार, व्यापार आणि माध्यमं ही एक सोनेरी साखळी आहे समाजकारण साधण्यासाठी. समाजकारण करता-करता राजकारण होते. नंतर अश्या व्यक्तीचा राजकिय नेता होतो. तळागाळातील सगळ्यांकडून मान्यता मिळते. राजकिय नेत्याचा लोकनेता होतो. म्हणजे थोडक्यात, ज्यांचा या सोनेरी साखळीच्या जेवढ्या जास्तीत जास्त कड्या (लिंक्स) मध्ये स्वतःचा (व्यक्तिशः) वावर असेल, तेवढी त्यांची वाटचाल कमी खडतर होते, अधिक यशस्वी होते. एका दिवसात 30+ बूथ प्रमुखांच्या घरी भेट देऊन कुटुंबाशी संवाद साधल्याने grassroot कनेक्ट निर्माण होतो, पण हे करायला मेहनत आणि कार्यकर्त्याप्रती निस्पृह आदर असावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत फडणवीस यांनी याबाबत काळजी घेतली असे वाटते.

देवेंद्र फडणवीस यांचे वेगळेपण यातच आहे. त्यांची कार्यक्षमता, त्यांचे कौशल्य हे आता सर्वश्रुत आहे. 2014-19 मध्ये राज्यामध्ये एक स्थिर सरकार देऊन, राज्याला प्रगती पथावर अग्रेसीत ठेवले. 2015 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन अमेरिकन डॉलर करण्याच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या प्रयत्नात महाराष्ट्र एक ट्रिलीयन अमेरिकन डॉलरचे योगदान करेल असे फडणवीस यांनी 2019 मध्ये जाहीर केले होते, त्यांचे पुनरागमन झाले असते तर त्या अनुषंगाने योग्य ती पाऊले उचलली गेली असती, असो.

थोडक्यात, 2016-17 नंतर एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा उदय झाला होता, मात्र गेल्या अडीच वर्षांत त्याच्या तेजाची झळाळी अख्ख्या देशाने बघितली, त्यांच्या अनेक राजकिय विरोधकांना त्याचे चटके अनुभवायला मिळाले. मात्र आपल्या राजकारणात कधीही सूडबुद्धीचा साधा टीपूसही कधी दिसू दिला नाही. तरीही आपल्या अभ्यासू, मुद्देसूद आणि आक्रमक भाषणाने अनेकांना नामोहरम केले. दीड-दोन वर्षातच महाविकास आघाडी सरकार तीन मंत्री कमी झाली होती, फडणवीस ह्यांची राजकीय आक्रमकता दिसून येते.

निवडक एक-दोन व्यक्तींना राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनविण्याचे माध्यमांकडून कितीही प्रयत्न झाले तरीही, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष करणे जमले नाही.

आपल्या तीस वर्षांच्या राजकिय प्रवासात त्यांनी अनेक टप्पे पार केले – तरुण नगरसेवक ते महापौर ते आमदार, नंतर प्रदेश अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, नंतर मुख्यमंत्री पद आणि आता उपमुख्यमंत्री पद. हे करीत असतांना त्यांचे अनेक शुभचिंतक राहिले असतिल, मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कुठलाही मोठा राजकिय वरदहस्त नसलेला राजकारणी म्हणून त्यांची ओळख अजूनही वेगळी आहे. अर्थात, येणार्‍या दशकात त्यांच्याकडे पक्षाची सर्वोच्च जबाबदारी आणि देशाचे नेतृत्व कधीतरी येईल असे अनेकांना वाटते. फडणवीस हे आक्रस्ताळीपणा करणारे लक्षवेधक राजकारणी नाहीत. उलट, आपल्या कृतीने, भाषणाने, त्यांनी अडीच वर्षे राज्याचे राजकिय पटल गाजवले, अनेकांची प्यादी, वजीर घरी पाठवले. माध्यमांच्या दृष्टीने राज्यातील राजकारणाचे अनभिषिक्त सम्राट असलेले अनेक मान्यवर फडणवीस यांच्या राजकिय चालीमुळे संभ्रमात रहायचे. मुख्यमंत्री असतांना फडणवीसांना कधी जातीमुळे, तर कधी ते विदर्भाचे म्हणुन तर कधी त्यांना राजकिय अनुभव नसल्याचे कारणे पुढे करून त्यांना खिंडीत पकडण्याचे प्रयत्न अविरत सुरू होते. अर्थात तेल लावलेल्या पैलवानाला पकडणे सोपे नसते याची प्रचिती त्यांच्या राजकिय विरोधकांना नक्कीच आली असावी.

काही वर्षांपुर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कोच असताना रवी शास्त्री म्हणाले होते, “आम्ही विरोधी खेळाडूंना बघून खेळत नाही, आम्ही पीच प्रमाणे खेळतो (We don’t play the opponents, we play the pitch). फडणवीस हे सुद्धा अशीच काहीशी नीती वापरताना दिसतात, प्रत्येक वेळी वेगळी, त्यामुळे त्यांचे विरोधक गाफिल राहतात असे आढळते. मात्र हे करताना त्यांच्या वागण्यात आक्रस्ताळेपणा नसतो, त्यामुळे त्यांच्या मध्ये “किलर इन्स्टिंक्ट” नाही असे अनेक विश्लेषक म्हणतात, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असे म्हंटले होते. आक्रस्ताळेपणा किंवा खुनशीपणा असला तरच राजकारणी नेता शक्तिशाली समाजाला जावा हा भ्रम आहे याचे एक उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघता येईल. आपल्यावर, कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी होत असतांना सुद्धा त्याला संवेदनशील पणे कसे हाताळायचे याचे त्यांनी अनेकदा प्रात्यक्षिक दिले. क्रिकेटमध्ये काही खेळाडू आपल्या खिलाडूवृत्ती आणि नीतिमत्तेसाठी प्रसिद्ध होते, सुनील मनोहर गावसकर त्यातील एक – असे म्हंटले जाते की जर चेंडू बॅटीला लागून यष्टीरक्षकाकडे झेलला गेला तर पंचाचे बोट वर जायच्या आत ते चालायला लागायचे.

राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू व्यक्ति-सापेक्ष कधी करायचा किंवा मुद्द्यावर कधी आणायचा आणि त्यानुसार आपल्याला हवी असलेली खेळी करायची ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. फडणवीस यांनी ते बर्‍याच अंशी तडीस नेले होते, अर्थात राज्याला गती देण्याच्या कामाला काही काळ खंड पडला असला तरी, राजकारण मात्र सुरू होतेच, आणि आतातर अनेकांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर किंवा त्यांच्या राजकिय भवितव्यावर च प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीने काम करणारा विकासप्रणेता अशी आहे. शिक्षण, भाषा प्रभुत्व, अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी असलेली जिज्ञासु मनोवृति आणि चौकटीपलीकडे जाऊन नवीन विचार करायची क्षमता या गुणांमुळे त्यांची विश्वासार्हता देशातच नाही तर विदेशात सुद्धा आहे. तरुण पिढी सोबत त्यांचा कनेक्ट चांगला आहे. ब्रँड देवेंद्र फडणवीस हा विश्वास निर्माण करणारा एक सशक्त ब्रांड आहे.

2019 मध्ये देवेन्द्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणुन कार्यरत झाले असते तर राष्ट्रीय स्तरावर, विशेष करून पश्चिम भारतात त्यांचे राजकिय कद अजून वाढले असते. मात्र नियती म्हणा किंवा अजून काही, अडीच वर्ष राज्यातील कारभारातून ते बाहेर राहिले.

दरम्यानच्या काळात देशात धार्मिक कट्टरता एका नवीन स्तरावर पोहोचली आहे, त्याला आळा घालण्यासाठी अनेक नेते आपापले कसब पणाला लावत आहे, आजघडीला उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना दिसत आहेत, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सुद्धा प्रयत्न वाखाणले जाऊ शकतात. मात्र ह्या सगळ्या नेत्यांची प्रतिमा, कार्यपद्धती आणि व्यक्तिरेखा वेगवेगळया आहेत.

येणार्‍या काळात देशामध्ये आणि राज्यात सुद्धा धार्मिक कट्टरता हे मोठे आव्हान राहणार आहे, त्या अनुषंगाने राष्ट्रवाद, निर्विवाद हिंदुत्व (unapologetic hindutva) आणि तुष्टीकरणरहित विचारधारा अवलंबणे हेच गरजेचे ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या बाबी महत्वाच्या ठरतात, ठरतील. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेत कट्टरता जरी नसली तरीही, त्यांनी आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे – अगदी जाहीर पणे सुद्धा. अर्थात येणार्‍या काळात त्या भूमिकेला कृतीचे आवरण चढले तर त्यांची प्रतिमा आणि विश्वासार्हता नक्की वाढेल – उदाहरणार्थ साम्प्रदायिक दंगल हाताळणी, राज्यस्तरीय समान नागरी कायदा, धर्मांतरण विरुद्ध कायदा, लव जिहाद विरुद्ध कायदा, धार्मिक स्थळांविषयी ठोस नियमावली आणि कारवाई.

राज्याला औद्योगिक वैभव, विकास आणि राजकिय स्थैर्य पुन्हा मिळवून देणे क्रमप्राप्त जरी असले तरीही, राज्यात साम्प्रदायिक स्थैर्य स्थापित करणे ही येणार्‍या काळातली मुख्य प्राथमिकता ठरेल. आपल्या दुसर्‍या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा नवीन अवतार दिसेल का याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

परिवारवादी राजकारणावर त्यांची भूमिका सुस्पष्ट आहे. आपल्या परिवारातील, निवडणुकीच्या राजकारणातले ते शेवटचे असतिल हे त्यांनी ठामपणे जाहीर केले आहे. त्यांची ही भूमिका स्पृहणीय आहे, अर्थात ती किती आवडते ते वेगळे.

फडणवीस हे मिशन मोड मध्ये काम करतात असे म्हंटले जाते – प्रत्येक मिशनला वेगळी टीम. त्यामुळे त्यांच्याकडे युवा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संच तयार असतो. कुठल्याही एका ठराविक चौकटीत ना बसणारी त्यांची राजकिय बुद्धिमत्ता ही त्यांचे वेगळेपण जाणवून देते. बिहार आणि गोव्यात त्यांनी आपल्या बुध्दी-कौशल्य आणि सहकाऱ्यांच्या साथीने भाजपला मोठे यश प्राप्त करून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. वास्तविक पाहता, दोन्हीही राज्यात मोठी अ‍ॅण्टी-इन्कमबंसी होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभा आणि विधानपरिषदेत मिळविलेले यश त्यांची राजकिय परिपक्वता, आणि विरोधकांमध्ये त्यांना असलेली अनुकूलता अधोरेखित करते.

आगामी काळात मुंबईसह बारा मोठ्या महानगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे, मुंबई ही आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे (रू 45000 कोटी चे बजेट). फडणवीस हे कुठली किमया करून मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बनवतील याकडे अनेकांचे लक्ष आहे!

जाता जाता…

इतर राज्यातील व्यापाऱ्यांना, राजकारण्यांना महाराष्ट्रात वावरायला फारसे अवघड जात नाही (भाषा आणि कार्यसंस्कृती) त्यामुळे राज्याचे राजकारण पण शंभर टक्के राज्यातच ठरते असे नाही. त्यातच मुंबई अनेकांना भुरळ घालते. बरेचसे धागे दोरे इतर राज्यात गेलेले असतिल त्यामुळे एखादा राजकारणी आपल्या स्वकर्तृत्वाने त्याच्या राज्यात राजा बनेलच याची खात्री कुणीच देऊ शकत नाही.

भारतीय जनता पार्टी हा जगताला सर्वात मोठा राजकिय पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांची राजकिय वाटचाल, त्यांचे राजकिय यश नेत्रदीपक आहे. मागे वळून बघितले तर आपला राजकिय प्रवास कुठपर्यंत आणि कसा व्हावा, त्याचा वेग, आवाका किती असावा हे त्यांनी अत्यंत बारकाईने ठरवले असावे, पुढची वाटचाल कशी राहील याबद्दल त्यांना स्पष्टता असेल. पक्षामध्ये, आता किंवा आधीही त्यांची ओळख ठळकपणे एका गटाचे अशी कधीच राहिलेली नाही, काहींचा त्यामुळे संभ्रम होत असावा.

देवेंद्र फडणवीस यांचा पुढील प्रवास कसा असेल हे येणारा काळच दाखवेल, अर्थात ते याबाबतीत सजग असतीलच. यशस्वी वाटचालीकरीता त्यांना शुभेच्छा. 🙏

- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई

स्तंभलेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च  विश्लेषक  आहे.

Comments

  1. खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे, एकाच व्यक्ती बद्दल इतकी सर्व माहिती सोदाहरण थोडक्यात मांडणे हे लेखकाचे लिखाण कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती दाखवते.
    अभिनंदन देशमुख जी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 💐

      Delete
    2. Very informative Dhananjay

      Delete
    3. Thanks Dhananjay. You have created a perfect story a great politician on current political scenario.
      Very very true 👍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Battle of Generations, Mumbai

 4th January 2026 Battle of Generations - Mumbai’s time is “NOW”.. Mumbaikars’ tryst with democracy is on 15th January when voting for the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), asia’s richest governance setup takes place. This is a golden chance for voters across all generations like boomers, Gen X, Millennials and Gen Z to elect a set of corporators who could solve their basic problems, and address aspirations optimally. Although each generation’s priorities would be different – from modern infra to lesser corruption to transparency to communal harmony to environment to preserving linguistic identity or track record or diversity-equity-inclusivity to futurist (looking ahead).  This heady mix of generations and their priorities makes it a lot difficult for political parties to make a common denominator of promises, and put them on their voting platter. Hopefully, the intelligent ones will be able to make a good & believable platter of promises. Less of freebies and m...

Moment of reckoning, Mumbaikar

 Mumbai. For some it is a city of dreams and glamour, some had "haadsaas (accidents)", many made a "good life" out of it, few made generational wealth while enduring here. So what is this Mumbai exactly? Is it a home to slums or glossy sky-scrapers, curvy-flyovers or is it a thriving economy, or a culture or a simple habitat? Maybe all of that. Most importantly, it is like a sea of wealth!! With every incoming wave it brings wealth to many, and with every outgoing tide it erodes wealth of a few! This “sea of wealth” has been a relentless attraction for majority of its inhabitants. For ages and Generations. All socio-economic classes thrive on that sea of wealth : the ultra-mega-super rich to neo-rich to upper middle-class to middle class to lower middle-class to financially constrained. This sea of wealth gives rise to aspirations to each of these classes – every moment. All of these classes have a symbiotic relationships with each other, and that's how this ci...

Rise with the Sunrise: CBG

15 February 2026, Mumbai   Rise with the Sunrise: Compressed Bio-Gas and India’s Emerging Green Economy In every developing economy, certain industries initially appear futuristic and ahead of their time. Some of them fade away, but a few evolve into what we call  “sunrise sectors. ” After a period of incubation, these sectors become significant contributors to economic growth. India has witnessed this journey with Information Technology, Telecom and Modern Retail. Today's sunrise sectors are tomorrow's  dominant industries or mainstream economy staples. Today, sectors such as  Semiconductors, Solar Power Generation, Battery Energy Storage Systems (BESS), Millet-based Food Products, Green Data Centres, Green Warehouses, Technical Textiles and Compressed Bio-Gas (CBG)  are fast emerging as the new sunrise sectors of India.  While the underlying technologies have existed for decades, mainstream adoption is now accelerating. In the coming years, t...