Skip to main content

टिवटीवाट कमी, तडतडाटच जास्त

6 जुलै 20, मुंबई
टिवटीवाट कमी, तडतडाटच जास्त..

मार्च 1, 2006 ला एक संदेश जगाला मिळाला 'Just setting up my twttr". पाठवणार्‍याचे नाव होते जॅक डोरसी (Jack Dorsey). त्यावेळेस संकल्पना ही होती की आपण, त्या क्षणाला काय करीत आहोत हे जगाला (म्हणजे आपल्या contacts ला) एका छोट्या संदेशात सांगणे. एकाच वेळी हा संदेश तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांना जाईल अशी कल्पना होती. ब्रॉडकास्ट होईल असा. 

'Twttr' हे नाव काही जमत नाही म्हणुन एका सहकार्‍याने 'Twitter' हे सुचविले. 'Twitter' जगासमोर आले. 2006 मध्ये अ‍ॅप्पल ने iTunes सुरू केले त्यामुळे एका पॉडकास्ट प्लॅटफॉर्म कंपनिला त्यांची योजना अडगळीत टाकावी लागली. त्यामुळे 2006 च्या सुरुवातीपासूनच एका नवीन संकल्पनेवर काम सुरू होते, आणि त्यातून आधी 'twttr' आणि मग 'Twitter' जन्मास आले. रांगू लागले. काही काळात उभे राहून खेळू बागडू लागले.

1 ते 100 कोटी, फक्त तीन वर्षांत..
मार्च 2006 मधील पहिल्या ट्विट नंतर, केवळ तीन वर्षांत शंभर कोटी ट्विट साधण्याची किमया साधली गेली. मे 2009 पर्यंत 100 कोटीवर ट्विट झाले होते. म्हणजे अड़तीस महिन्यात, किंवा साडे अकराशे (1150) दिवसांत, किंवा सोळा लाख छप्पन हजार मिनिटात, किंवा नऊ कोटी त्र्यांणा  लाख साठ हजार सेकंदात  (1150*24*60*60) शंभर कोटी ट्विट्स. म्हणजे, दर सेकंदाला दहा ट्विट्स! व्वा, जॅक भाऊ की तो निकल पडी!
  • ट्विटर ने पंधराव्यावर्षांत पदार्पण केले.
  • आज दर सेकंदाला सहा हजार ट्विट्स होतात, म्हणणे ताशी दोन कोटी, आणि दिवसा पन्नास कोटींच्यावर ट्विट्स! जॅक भाऊ जोरात!!
  • सुरुवात जरी "मी सध्या काय करतोय /करतेय" हे जगाला कळवण्याचे माध्यम म्हणून झाली असली तरी, नंतर त्याचे स्वरुप बदलले, लोकप्रियता वाढली, वापरकक्षा रुंदावल्या. सतरावर्षांत बीजाचे रोपटे आणि रोपट्याचे वटवृक्ष झाले.
  • मागच्या वर्षी (2019) ट्विटर चे वार्षिक उत्पन्न 3.4 बिलियन अमेरीकन डॉलर (जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये) एवढे होते.
  • सरासरी दररोज पंधरा कोटी आणि महिन्याला तेहतीस कोटी लोक ट्विटरवरती सक्रिय असतात.
  • भारतात जवळपास दीड कोटी लोक (खाती) सक्रिय आहेत.
सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमे ही जगात सगळीकडे आपले अस्तित्व निर्माण करून आता स्थिरावली आहेत. एका आकडेवारीनुसार जगात जवळपास 3.2 बिलियन लोक (म्हणजे 320 कोटी, जगाच्या जनसंख्येचे जवळपास 40%) सोशल मीडिया वापरतात. दरडोई दिवसाला सरासरी दोन तास या माध्यमांवर खर्च केले जातात. यावरूनआपल्याला या माध्यमांची व्यापकता, त्यांचे महत्व आणि गांभीर्य कळेल.

आज ट्विटर हे फक्त एक समाज माध्यम म्हणुन ओळखले जात नाही. हे एक भले मोठे व्यासपीठ झाले आहे. आधी एकशेचाळीस आणि आता दोनशेऐंशी एवढी मर्यादा असलेल्या एका ट्विटची किमया भारी असते. एका ट्विट ने अनेक घडामोडी घडू शकतात.

कुणीही, कधीही, कुठल्याही विषयावर कसेही व्यक्त होते. आधी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ट्विटरचा वापर आता मत प्रकट करण्यासाठी सुद्धा होतो, मतांतर करण्या साठी होतो, मतभेद करविण्यासाठी होतो, भांडण लावण्यासाठी आणि भांडण करण्यासाठी होतो, विसंवाद निर्माण करण्यासाठी होतो.

प्रभावशाली माध्यम..
ट्विटर हे माध्यम म्हणुन खुप प्रभावी आहे, परन्तु त्याचे नुकसान सुद्धा आहेत. अफवा पसरविणे, निवडणुकीच्या काळात मतांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. अर्थात यातील काही प्रयत्न प्रामाणिकपणे माहिती देण्यासाठी असतात तर काही गाफील जनतेला पाहिजे तशी माहिती पुरवून गैरसमज फैलावण्यासाठी करतात.

समाजमाध्यमे - ट्विटर, फ़ेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम आणि व्हॉटसप्प ही गरजेची आहेत, पण आज त्यांच्या वापरकक्षा फार रुंदावल्या आहेत. 2016 च्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत या माध्यमांनी महत्वाची भूमिका निभावली होती. भारतातील निवडणुकीत सुद्धा यांचा भरपूर उपयोग केला गेला, काहींनी कल्पकतेने केला, जिंकले, तर काहींचा कल नेहमीप्रमाणे घृणा, तिरस्कार फैलावण्यावर होता.

आज याचा नको तसा वापर सुद्धा सुरू आहे - तथाकथित उदारमतवादी कलाकार, खेळाडू, लेखक, विधिज्ञ या माध्यमांचा (गैर) वापर करून कधी डावी विचारधारा लादण्याचा प्रयत्न करतात तर कधी जिहादी मानसिकतेला खतपाणी घालतात. जम्मू आणि काश्मीर मधील एकतर्फी बातम्या पसरविण्यासाठी म्हणा किंवा नागरिक संशोधन कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात दहशत पसरवण्यासाठी म्हणा, असामाजिक तत्त्वे सामाजिक माध्यमांचा (ट्विटर, फ़ेसबुक, व्हॉटसप्प) गैरवापर करताना दिसले. प्रसिद्ध होण्याच्या स्पर्धेत मागे पडू या भीतीने अनेकदा काही प्रसारमाध्यमे किंवा पत्रकार किंवा विश्लेषक सामरिक दृष्टया संवेदनशील माहिती सुद्धा ट्विटरवरती टाकतात.

ट्विटर एखाद्याला प्रसिद्ध नक्कीच करू शकते, पण प्रसिद्धीचा कालावधी फार कमी असू शकतो. सतत प्रसिद्ध राहण्यासाठी काही महाभाग काही ना काही कुरापत करीत असतात.

मतप्रवाह तयार करता येतो..
ट्विटरचा वापर माहिती, सूचना, देण्याच्या सोबतच आपल्या विचारांना चालना देण्यासाठी केला जातो. ज्याला मतप्रवाह तयार करणे असे म्हणतात (opinion making before mobilizing) त्यासाठी व्यावसायिक संस्थांकडून (किंवा आपल्याच सहकाऱ्यांकडून) हॅश्टॅग (#) चालवतात, अधिकाधिक लोकांना (जास्तीत जास्त -राजकारणी किंवा त्या कार्याशी निगडित नसलेल्या) तो हॅश्टॅग वापरुन ट्विट करण्यास आवाहन करतात (बर्‍याचदा हे आवाहन गुपचुप होते, जय व्हॉटसप्प).

बर्‍याचदा बातमीवाहिन्या (न्यूज चॅनल्स) पण आकर्षक हॅश्टॅग चालवून आपली वाहिनी कशी जास्त प्रसिद्ध होईल या मागे अहोरात्र मेहनत घेत असतात. आपल्या हॅश्टॅगला वर आणण्यासाठी, किंवा ट्रेडिंग करण्यासाठी छक्के पंजे करण्यात येतात, प्रतिरोधी हॅश्टॅग बनवून चालविण्यात येतो, स्पर्धा रंगते, कधी-कधी ती नको त्या थरावर जाते. फक्त दुसर्‍याचा हॅश्टॅग जास्त चालतोय आणि तो चालू नये म्हणुन कधी स्वतः तर कधी आपल्या प्रसिद्धि सल्लागारांच्या अट्टाहासाने (त्यांचा हेतू निर्मळ असतो - आपल्याला आपले दोन पैशे मिळत रहावे एवढाच) असले प्रकार घडतात. हे म्हणजे, जर एखादा फलंदाज चांगला खेळत असेल तर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी बॉडीलाइन गोलंदाजी करण्याचे किळसवाणे प्रयत्न करणे. परंतु फलंदाज त्याला भीक घालीत नाही आणि त्यांचे प्रयत्न टोलावून लावतो.

ट्विटर रणांगण.. 
काही महिन्यांपूर्वी राज्यात भाजपने, "माझे अंगण रणांगण" हे आंदोलन अभिनव पद्धतीने राबविले, ट्विटर वर त्याला #महाराष्ट्रबचाओ या हॅश्टॅग अंतर्गत चालविले गेले. खरेतर यात काहीच महाराष्ट्र द्रोही नव्हते परंतु, ट्विटरवर भाजपच्या #महाराष्ट्रबचाओ या विरुद्ध दुसरा हॅश्टॅग चालविण्याचा प्रयत्न झाला. दिवसाअखेरीस तो प्रयत्न पडला असे आढळले.

ट्विटर चलाख आहे.. 
एखादा हॅश्टॅग कसा ट्रेंड होतोय याकडे ट्विटरचे पूर्ण लक्ष असते, तो कोण पुढे करतोय - प्रामाणिक की तोतये (फेक / बॉट ) खाती हे सुद्धा तपासले जाते. कदाचित काही अतिउत्साही लोकांना त्याचा गंध नसावा.

याचा अर्थ, तुमच्या कडे नुसते शारीरिक बळ असणे गरजेचे नसते, ते कसे मैदानात वापरायचे याचेही कसब असावे लागते. नुसते थोडेफार संगणक चालवण्याचे ग्यान (ज्ञान हा शब्द मोठा होईल) आहे, आणि काही ताई दादांचा आशीर्वाद आहे म्हणुन आपण ट्विटर वर काहीही करू शकतो हा गैरसमज अनेकांना तोंडघशी पाडू शकतो, अनेक पडलेसुद्धा.

गतिमान माध्यम.. 
ट्विटर हे एक प्रसारमाध्यम आहे, त्याला जोड आहे सामाजिक व्यापकतेची आणि गतीची. तेव्हा त्यातून आपल्याला पाहिजे तसा संदेश कसा द्यावा याचा विचार होणे महत्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला सामान्य जनतेच्या मानसिकतेचा अभ्यास असावा लागतो. आपली ट्विट कुणासाठी आहे (खरे तर ट्विटर वरती असे करणे अशक्य आहे, टीव्ही वर होऊ शकते), आपल्या ट्विट मधुन मिळणारा संदेश हा कसा विश्वासार्ह वाटावा, त्याची भाषा कशी असावी याचे कौशल्य असावे लागते तरच तुमच्या ट्विट्सला पाहिजे तसा प्रतिसाद मिळेल किंवा त्याचा असर पडेल. नुसती चांगली टाइपिंग येते म्हणुन कुणी चांगला लेख लिहू शकत नाही, किंवा जाहिरातीसाठी चांगली संहिता (ad copy) बनवू शकत नाही. त्यासाठी पाहिजे ते कौशल्य असावे लागते. इथेही तसेच आहे. हे माध्यम कसे चालते ह्याचा गंध असावा लागतो. सध्या 'आयटी सेल' चे पीक सगळ्याच राजकिय पक्षांत येत आहे! अभिनंदन सगळ्यांचे!! ट्विटर, फ़ेसबुक हे अत्यंत शक्तिशाली समाज माध्यमे आहेत. जमले तर ठीक नाही तर मागाल भीक अशी परिस्थिती होऊ शकते, तेव्हा त्यांचा वापर सांभाळून करणे गरजेचं आहे. 

चोखंदळ वापर गरजेचा..
अनेक प्रसिद्ध व्यक्ति, राजकारणी ट्विटरचा वापर चोखंदळ पणे करतात. त्यांच्या ट्विट्स बघून त्यांचे अनुयायी त्या ट्विट ला पुन्हा ट्विट (रीट्विट) करतात. अर्थात कोण स्वत ट्विट करतो आणि कोण प्रसिद्धी सल्लागारांच्या (PR Agency)  मदतीने ट्विट करतो हे नेहमी गूढ राहते. फार-फार तर ज्या वेळेस ट्विट आला त्यावरून काही कयास बांधले जाऊ शकतात. जापानच्या प्रसिद्ध उद्योजक यूसाकू मेइझावा यांच्या नावावर, एखाद्या ट्विट चे सर्वात जास्त रीट्विट (चवेचाळीस लाख) झाल्याचा विक्रम आहे

शोकांतिका..
आज परिस्थिति अशी आहे की ट्विटरवर खुलेआम शिवीगाळ होतेय, अर्वाच्य, अश्लाघ्य भाषेचा वापर सर्रास होतोय. एखाद्याचे मत आवडले नाही, किंवा त्याची प्रसिद्धि वाढली की राजकारणी मंडळींचे (किंवा प्रसिद्ध व्यक्ति) बगलबच्चे, मग ते पक्षाचे असो की भाड्याने (त्यांचे गोंडस नाव PR एजेंसी असु शकते) लावलेले असो (अर्थात राजकारण्यांच्या आशीर्वादाने), अश्या व्यक्तींची खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतात.

आपण काय लिहितोय, कसे व्यक्त होतोय याचे काहीच भान ना ठेवता. एखाद्या व्यक्तिवर त्याच्या कामावरून किंवा कार्यपद्धतीवरून (माहिती नीट तपासून) टीका केली जाऊ शकते. अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे, पण त्याचा विपर्यास एवढा होतो की टीका व्यक्तीं पुरत्या मर्यादित ना राहता ती त्यांची जात, धर्म, त्यांचे रंग-रूप, त्यांच्या परिवारातील सदस्य (ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही), शारीरिक व्यंग, इत्यादी बाबींवर नको त्या पद्धतीने लिहिले जाते. टीका बाजूलाच राहते.

कारवाई गरजेची.. 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिवसरात्र ट्रोलिंग सुरू असते, कधी-कधी तर त्यांच्या ट्विटर लाइव मध्ये सुद्धा हे महाभाग आपल्या विकृतबुद्धी प्रदर्शित करतात. अश्या लोकांवर काही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही, मात्र काहींना ट्रोलिंग आवडले नाही म्हणुन मोठ्या व्यक्तींनी आपल्यावर टीका करणाऱ्याला आपल्या घरी बोलावून अमानुषपणे मारहाण केल्याचे संदर्भ आहेत. असो.

ट्रोलधाड..
मतभेद आहे म्हणुन ते व्यक्त करण्याच्या नावाखाली सर्रास ट्रोलिंग (trolling) केली जाते. 'याला हाण, त्याला मार ' हे ब्रीदवाक्य ठेवून हे ट्रोलकर दिवसरात्र धिंगाणा घालीत असतात. अनेकदा बनावटी खाती बनवून. याला आळा घालण्यासाठी कायदा जरी असला तरीही त्याची अंमलबजावणी दर वेळेस करणे जिकरीचे आहे. सराईत ट्रोलकर (आणि त्यांचे पाठिराखे) नेमका याचाच फायदा घेत असावेत. आम्ही कशी ट्रोलधाड टाकतो, ट्रोलिंग करण्यासाठी आमच्याकडे किती मोठी ट्रोलगँग आहे हे दाखविण्यासाठी चुरस लागते. खालील ओळी त्यांच्यासाठी..
"मी ट्रोलकर ट्रोलकर, ट्रोलकर ट्विटर चा राजा
दर मिनिटाला येऊन टाकतोय कचरा माझा,
ताई दादांचा लाडाचा ट्रोल हो मी न्यारा ,
दिवसरात्र पातळी सोडून टीकेचा करतो मारा,
मी ट्रोलकर ट्रोलकर, ट्रोलकर ट्विटर चा राजा."

समाजातील सगळ्याच तत्त्वांनी - समाजकारणी, राजकारणी, औद्योगिक, यावर विचार करणे गरजेचे आहे.आज दिवसाला पन्नास कोटी ट्विट्स होतात. यातील किती सकारत्मक आणि किती नकारात्मक असतिल यातील किती ट्विट्स ट्रोलकर करतात याचा अंदाज ट्विटरच देऊ शकेल.

जाता जाता..
अनेकांनी ट्विटर सारख्या समाज माध्यमांना हेच आपल्या समाज व्यवस्थेचे भविष्य आहे याचा निर्वाळा दिला आहे. भविष्य काय असते. जर चौदा वर्षांपूर्वी सुद्धा एखाद्याची मानसिकता विकृत होती आणि आजही ट्विटर वरती तो त्याचे दिवसरात्र दाखले देतो, तर ट्विटर भविष्य कसे? तंत्रज्ञान प्रगत झाले म्हणून ते भविष्य होऊ शकत नाही, मनुष्य त्याच्या अधीन होऊ शकत नाही. विचार हा भविष्य असतो. विचार महत्वाचा असतो. (Future is what? Technology? Wealth? Power? No, Future is  thought). काळानुरूप आपण प्रगल्भ होतोय याची कल्पना ट्विटर सारख्या माध्यमांतून देता येऊ शकते. नळावरील भांडण्यासारखे ट्विटर वर येऊन भांडायचे एवढाच जर एखाद्याचा प्रवास असेल तर मग त्याला कुणीच काही करू शकत नाही. अश्या लोकांसाठी, फक्त आपले मत जुळत नाही मग समाजात सतत तेढ बनवून ठेवायची, किंवा कुणाचे प्रामाणिक प्रयत्न जर आपले काळेकर्म जगापुढे आले असतिल म्हणुन मग अश्या व्यक्तीचा सामाजिकद्वेष निर्माण करायचा हाच एककलमी कार्यक्रम उरतो.

ज्येष्ठ साहित्यिक गुलज़ार (सम्पुरण सिंह कालरा) यांच्या सांगण्याप्रमाणे सगळ्यांनी आरसे घालणे हाच उपाय..

"आओ हम सब पहन ले आइने
सारे देखेंगे अपना ही चेहरा
सारे हसीन लगेंगे यहाँ

है नही जो दिखाई देता है
आइने पर छपा हुआ चेहरा
तर्जुमा आइने का ठीक नही"

शुभम भवतु.

धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com
 (लेखक एक मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)


Comments

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...