Skip to main content

किलर इन्स्टिंक्ट

26 जून 20
किलर इन्स्टिंक्ट (Killer Instinct)

killer instinct - a tendency to be ruthless and single-minded in dealing with opponents. म्हणजे आपल्या विरोधकांशी लढताना निर्दयीपणे आणि एककल्ली पणे वागणे..

थोडे मागे जाऊया, 1996 च्या क्रिकेट विश्वकप मध्ये जो भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान येथे झाला होता. श्रीलंकन क्रिकेट टीम विश्वविजेती झाली होती ऑस्ट्रेलियाला हरवुन.

या  विश्वचषकातील बंगलोर येथे झालेल्या भारत पाकिस्तान मधील उपांत्यपूर्व सामन्याची गोष्ट आहे. नवज्योतसिंह सिद्धू (93) आणि अजय जडेजा (45) यांच्या भरघोस योगदानामुळे भारतीय चमूने पन्नास षटकांत 287 धावा केल्या. पाकिस्तानला 49 षटकांत 288 धावा करायच्या होत्या. त्यांची सुरुवात जोरदार झाली, 11 व्या षटकांत पहिली विकेट पडली तेव्हा  87 धावा झाल्या होत्या. अपेक्षित असलेल्या रनरेट पेक्षाही पाकिस्तानचा रनरेट या घडीला चांगला होता.  पाकिस्तानचा कर्णधार आमिर सोहेल त्या दिवशी चांगला जमला होता, परंतु 15 व्या षटकांत गम्मत झाली. भारताकडून "लोकल बॉय" वेंकटेश प्रसाद गोलंदाजी करीत होता. त्याचा पाचवा चेंडू सोहेल ने ऑफ साइडला तडकावला, चौकार.
आपल्या या कर्तुत्वाला झळाळी देण्यासाठी तो पुढे आला आणि प्रसादला म्हणाला, "जा बॉल आण". खेळाडू असले मनाचे खेळ (mind games) खेळतच असतात, त्यात तर हा विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना, तोही भारताविरुद्ध, आणि भारतात! सोहेल कदाचित त्या क्षणाला जाम आनंदला असावा, कारण प्रसाद हा "लोकल बॉय" होता. बहुतांश खेळाडुंना "लोकल बॉय" सोबत छेड़खानी किंवा चेष्टा करण्याची एक विशिष्ट सवय असते. परंतु प्रसादचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत होता. पुढचा चेंडू त्याने वेगाने आत ढकलला आणि सोहेलच्या यष्ट्या उडाल्या, क्लिन बोल्ड!! प्रसाद आपल्या शांत स्वभावामुळे शेवटी जिंकला, अर्थात काही लोक याला सोहेलचा अतिशहाणपणा जबाबदार होता असेही म्हणु शकतात. पुढे भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे पाकिस्तान 39 धावांनी हरला, मात्र याचे खापर सोहेल वर फुटले कारण पाकिस्तानची गच्छंती झाली होती.

सोहेल जेव्हा आक्रमक खेळत होता, त्यावेळी अनेकांना, तो "किलर इन्स्टिंक्ट" असलेला एक उत्तम उदाहरण वाटत होता, मात्र त्याचाच हा 'किलर इन्स्टिंक्ट' शेवटी त्यालाच नडला.

काही वर्षांनी सोहेलला या विषयी विचारले तेव्हा तो म्हणाला की, 'प्रसाद त्यादिवशी खूपच टिच्चून गोलंदाजी करीत होता. त्याची देहबोली खूपच साधारण होती, त्याच्यावर भारी पडण्यासाठी काहीतरी वेगळे करावे असे मला वाटले. पण तो मात्र ढळला नाही, पुढचा चेंडू त्याने त्याच्या पूर्ण शक्ति + युक्तीनिशी मला टाकला' . असो.

विषय "किलर इन्स्टिंक्ट" हा आहे. जर सोहेल त्या चेंडू आधी किलर इन्स्टिंक्ट चा एक उत्तम उदाहरण होता, मात्र एका चेंडूंत तो खलनायक झाला. तेव्हा त्याचा "किलर इन्स्टिंक्ट"  कुठे गेला?

असे अनेक उदाहरणे आहेत - खेळात, राजकारणात, व्यापारात. इतकेच काय, आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण एकमेकांना यावर मापतो. अमक्याकडे कसा किलर इन्स्टिंक्ट, आणि तुझ्याकडे नाही, इत्यादी इत्यादी. कधी अतिशयोक्ती पण होत असावी. पण किलर इन्स्टिंक्ट हा विषय दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, त्यामुळे तो समजणे गरजेचे आहे.

एखाद्याला एखादी गोष्ट साध्य करण्याची असेल तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी मेहनत, शक्ति आणि बुद्धी लावण्याची तयारी, आणि काहीही करून ती मिळविणे याचा ध्यास म्हणजे किलर इन्स्टिंक्ट असावा असे वाटते. आक्रस्ताळेपणा किंवा खुनशी ना होता पण आपण पाहिजे ते साध्य करू शकतो.

कुठलीही गोष्ट करतांना आकांडतांडवपणा करून मिळविणे म्हणजे किलर इन्स्टिंक्ट नव्हे. वेंकटेश प्रसाद मध्ये किलर इन्स्टिंक्ट नव्हता का? जर नसता तर तो भारतीय टीमकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलाच नसता. त्याच्या देहबोलीतून तो तसे दाखवायचा नाही, ऐवढेच काय ते त्याच्या विषयीचे विशेष.

भारतीय संघात जवागल श्रीनाथ, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी असे अनेक खेळाडू होते जे अत्यंत शांत देहबोली ठेवून खेळायचे (खूपच क्वचित ते आरडाओरडा करायचे). या तिघांनी अनेक सामने रंगविले होते, आणि बरेच जिंकले सुद्धा.  दुसर्‍या बाजूला काही अपवाद होते, जसे सौरव गांगुली, युवराज सिंह, हरभजन सिंह, विराट कोहली किंवा ऋषभ पंत. हे आपल्या देहबोलीतून व्यक्त व्हायचे किंवा होतात. त्यांनी सुद्धा अनेक सामने जिंकवले आहेत. तेव्हा सामना जिंकणे हेच या दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचे ध्येय होते.

लॉन टेनिस मध्ये इवान लेंडल किंवा स्टेफान एडबर्ग हे अत्यंत शांत खेळाडू म्हणुन ओळखले जायचे. तर दुसरीकडे मॅकेनरो किंवा ईवानीचेविक हे अत्यंत लहरी रसायन होते, टेनिस कोर्टवर ते भयंकर व्यक्त व्हायचे, आरडाओरडा करायचे, रॅकेट तोडायचे. परंतु पुन्हा तेच - हे चौघेही खेळाडू अनेकदा विजयी ठरलेत.

तेव्हा, माझ्यामते किलर इन्स्टिंक्ट हा स्वभावत असतो. महत्वाचे आहे ते आपले उद्देश्य आपण कसे आणि कधी साध्य करायचे याबाबतची असलेली स्पष्टता.

परवा एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्यात किलर इन्स्टिंक्ट नाहिये. त्यांच्या वक्तव्यावर स्वतः मुलाखतकारच थक्क झाला असावा, त्याच्या लेखी मोठा "स्कूप"!! 

फडणवीस हे फिरकी गोलंदाजी करायचे असे ऐकले होते, त्यामुळे गुगली टाकण्यात ते माहीर असावेत.. एखादा वेळेस त्यांचे काही विरोधक हे ऐकून आनंदी झाले असतिल. परंतु काळच दाखवेल त्यांचे पुढे काय झालेते!

आपल्याला जे साध्य करायचे ते जर साधेपणाने होत असेल तर आक्रस्ताळेपणा कशाला हवा? गलिच्छ भाषा, धमक्याची काय गरज आहे? 

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचा जवळपास 28-29 वर्षांचा अनुभव आहे. काही तरुण राजकारण्यांचे वय नसेल तेवढी त्यांची कारकीर्द आहे. अर्थात महाराष्ट्रात, फडणवीस यांचे जेवढे वय आहे तेवढी कारकीर्द असलेले सुद्धा नेते आहे. मोठे आणि कर्तुत्वशाली नेते आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाही.

विषय फडणवीस यांनी टाकलेल्या गुगलीचा आहे. 2014 मध्ये शपथविधित झाल्यावर अनेक मंडळी (राजकारणी नेते, माध्यम) त्यांना तरुण किंवा अननुभवी राज्यकर्ता म्हणुन प्रस्तुत करण्यात व्यस्त होते, तर दुसरीकडे फडणवीस मात्र राज्याची घडी बसविण्यात मग्न. पहिले वर्षे, दीड वर्षे त्यांनी प्रशासन पूर्णता आपल्या अखत्यारीत घेतले, हे करीत असताना काही राजकिय वादळे आलीत, त्यांना ते अत्यंत धीराने पुढे गेले. वरवर दिसत नसले तरीही डोक्यामध्ये अनेक धागेदोर्‍यांची नीट खुणगाठ करीत गेले असावे. 

मात्र 2016 पासून त्यांनी राज्यातील राजकारणाची दिशा बदलायला सुरू केली. एकेक करून भाजप स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका निवडणुकी जिंकू लागली. फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे म्हणुन राज्यात मोठी गुंतवणूक आली, राज्याची कमाई वाढली, भरमसाठ उद्योगधंदे आले.

जलयुक्त शिवार अभियान, शेतकरी कर्जमुक्ती, 375 किलोमीटरचे मेट्रो चे जाळे, नागपूर मुंबई महासमृद्धि महामार्ग, कोस्टल रोड इत्यादी पायाभूत सुविधांची बीजे रोवली गेली, काही सुरू झालेही. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन होत असताना त्यांनी आंदोलकांना, विरोधकांना आणि आपल्या पक्षातील मंडळीना सोबत घेऊन परिस्थिती नीट हाताळली. नंतर दूसरी अनेक आंदोलने झालीत. शमली सुद्धा. 

हे सगळे करीत असताना राजकारण सुद्धा सुरू होतेच, पक्षांतर्गत म्हणा किंवा पक्षाबाहेर. 2018 पासून पक्षामध्ये नवीन चेहरे येऊ लागले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मेगाभर्ती सुरू होती.

आता, राज्यकारभार आणि राजकारण पेलायचे, आणि सोबत युती सरकार  पूर्ण पाच वर्षे चालवायचे याला काही ना काही "किलर इन्स्टिंक्ट" तर लागलाच असेल? पाच वर्षे प्रशासन व्यवस्थित चालले. फडणवीस यांना जर "100 किलर" इन्स्टिंक्ट नव्हता तर मग त्यांचे राजकीय विरोधक आक्रमक का होते? अजूनही आहेत. एक वेळ तर अशी आली होती की फडणवीस विरुद्ध अख्खा राजकीय पक्ष असा सामना रंगला होता. हे होत असताना काही महानुभव आम्हालाच किलर इन्स्टिंक्ट आहे असे दाखवित रिंगण घालीत होते.

शेवटी, महत्वाचे काय आहे? जे पाहिजे ते साध्य झाले की नाही. ते व्हायला लागणारी दूरदृष्टि, पावले उचलायला लागणारी हिम्मत, आपली खेळी खेळण्यासाठी प्यादी, हत्ती घोडे जमविणे, आणि मग शांतपणे आपला डाव टाकणे.

जर, मागच्या नोव्हेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे सगळे घडले असते, तर देवेन्द्र फडणवीस हे पश्चिम भारतातील एक मोठे नेतृत्व म्हणुन पुढे आले असते. पाच वर्षे कारभार करून जर पुन्हा युतीच्या 161+ जागा आल्या, तर याचा एकच अर्थ होतो - जो याचा शिल्पकार आहे त्याला "किलर इन्स्टिंक्ट" आहे. कदाचित त्यांचा मनमिळावू स्वभाव त्यांच्या "किलर इन्स्टिंक्ट" ला मास्क करीत असेल!! 

एखाद्या वेळेस नियतीला दुसरे काही दाखवायचे असेल. बघुया. परंतु, कुणी जास्त हुरळून जाऊ नए कारण देवेंद्र फडणवीस यांचा  silent "किलर इन्स्टिंक्ट" हा घातक ठरू शकतो. 

महाराष्ट्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोना महामारी, चक्रीवादळ, आणि त्यात मंत्री, प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव. तीन महिन्यात बाराशे शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेत. कोरोना महामारी मुळे वैद्यकीय आणि प्रशासनावर पडलेला प्रचंड भार, मध्यंतरी पोलिसांवर झालेले भ्याडहल्ले, आणि कोरोनामुळे तीसच्यावर पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू या सगळ्या घटना राज्यात घडल्या. मध्यंतरी फडणवीस दौर्‍यावर असताना सामान्य जनता त्यांना, "तुम्ही असायला हवेत" , किंवा "लवकर परत या" असा आशीर्वाद देत होती.
 1 डिसेंबरला भाषण देताना विधीमंडळात त्यांनी जेव्हा
"मेरा पानी उतरता देख, 
मेरे किनारे पर घर मत बसा लेना, 
मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा!" 
असा हुंकार भरला तर अनेकांच्या पोटात गोळा नक्की भरला असेल!!

सत्तेत ते कधी परत येतील याची खात्री कुणी देऊ शकत जरी नसले तरीही, ते कधीही येऊ शकतात हे ही मानणारे अनेक आहेत. यातच त्यांचा किलर इन्स्टिंक्ट अधोरेखित होतो. जनता जनार्दन जाणकार असते, वेळेवर आपले मत व्यक्त करतेच, करेलही . 

अपेक्षित असे घडायला काही काळ जाऊ द्यावा लागेल, तोपर्यंत कळ सोसावी लागेल. "म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ मात्र सोकावला"  म्हणायची एवढी वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणजे झाले. तेव्हा येणारा काळच दाखवेल की देवेंद्र फडणवीस यांनी हसतहसत टाकलेल्या गुगलीला "किलर इन्स्टिंक्ट" ची पावती मिळते का? विकेटा मिळताता का? कुणास ठाऊक, एखाद्या वेळेस, धोनी जसा लेग स्पिनरला वाइड बॉलवर टाकायला सांगून स्टंपींग घडवायचा तशीच एखादी विकेट?? सचिन तेंडुलकर सुद्धा कधी कधी बाऊन्सर टाकायचा म्हणे!! 

एका अनाम कवीने (अमर उजाला या पोर्टलवर ) लिहिले आहे, समय बलवान होता है..
"चलता रहा तू बढ़ता रह,
होने वाली शाम है,
जख्म तेरे भी भर जायेंगे,
यह समय बड़ा बलवान है,
कैसे तोड़ देगा कोई तुझे?
कैसे छोड़ देगा कोई तुझे?
होंसले का तीर है जब,
ख्वाहिशों की उड़ान है,
यह समय बड़ा बलवान है,
मंजिलों को भूलते जो खाते है वो ठोकरें,
खेलते जो जान पे होती उनकी ही पहचान है,
यह समय बड़ा बलवान है.."

कालाय तस्मै नमः.

धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com

(लेखक एक मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)

Comments

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...